
मलकापूर, दि. ३ जुलै : मलकापूर येथील सखल मुस्लिम समाजाच्या वतीने राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठवून भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नाजिया इलाही यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नाजिया इलाही यांनी विविध माध्यमांमधून तसेच मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये इस्लाम धर्म, हजरत मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आणि उम्मुल मोमिनीन हजरत आयशा (रजि.) यांच्या संदर्भात आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून समाजात द्वेष, तणाव आणि तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा तसेच धार्मिक श्रद्धांचा सन्मान राखण्याचा अधिकार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही धर्माबाबत किंवा धर्मगुरूंबाबत अपमानास्पद वक्तव्ये करणे हे सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेस बाधक ठरू शकते, असेही निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीने कायद्याचे उल्लंघन केले असल्यास त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सखल मुस्लिम समाज, मलकापूर यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
