जलगावच्या एच. जे. थीम महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी परिसर दुमदुमला

जळगाव प्रतिनिधी : इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जळगाव येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साह, उल्लास आणि राष्ट्रप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ७.४५ वाजता इकरा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संचालक अब्दुल माजिद जकेरिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इकरा एज्युकेशन सोसायटीचे संचालक तारिक रऊफ शेख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात टी.वाय.बी.एस्सी.चा विद्यार्थी ताहा खान याच्या कुरआन पठणाने झाली. डॉ. युसूफ पटेल यांनी अध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडला, तर डॉ. मुस्तकीम बागवान यांनी त्यास अनुमोदन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल माजिद जकेरिया होते.
प्राचार्य डॉ. वकार आर. शेख यांनी प्रास्ताविकातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदान यांचे स्मरण करणे तसेच राष्ट्रनिर्मितीत योगदान देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ८० वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला.
प्रमुख अतिथी तारिक रऊफ शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशाच्या प्रगतीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. शिक्षण, रोजगार, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रसेवेच्या माध्यमातून युवकांनी देशाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी खानदेशचे गांधी म्हणून ओळखले जाणारे मीर शुकरुल्लाह यांच्या बलिदानाचाही विशेष उल्लेख केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, राष्ट्राच्या प्रगतीतील युवकांची भूमिका आणि महिला स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान या विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली. अल्फिया नबी कुरैशी, शबनम सैयद इकबाल आणि अश्ना अखलाक शेख यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. रिदा फातिमा अहमद हिने विकसित भारताचा संकल्प मांडला, तर आफताब याने धनाजी नाना चौधरी यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. सैयद रेहान याने पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. तस्मिया अमजद खान हिने सादर केलेल्या देशभक्तीपर गीताला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण एफ.वाय.बी.ए.चा दृष्टिहीन विद्यार्थी कुरैशी मोहम्मद दानिश याचे प्रेरणादायी भाषण ठरले. रोजगाराच्या संधी, देशभक्ती आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका याबाबत त्याने प्रभावीपणे विचार मांडले. आत्मविश्वासपूर्ण भाषणाबद्दल उपस्थितांनी त्याचे कौतुक केले. मिनाझ रफीक खान हिने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतानेही वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून गेले.
कार्यक्रमाला डॉ. चांद खान, डॉ. आयशा बासित, डॉ. फिरदौस शेख, प्राध्यापक काजी मुजम्मिलुद्दीन नदवी, डॉ. हाफिज शेख, डॉ. साजिद मलिक, डॉ. इरफान शेख, डॉ. सदाशिव डापके, डॉ. राजू गवारे, डॉ. शबाना खातीक, डॉ. अख्तर शाह, प्रा. उमर पठाण, डॉ. कहकशां अंजुम, प्रा. मुबाशिर पटेल, प्रा. अशरफ शाह, प्रा. अमरीन शेख, प्रा. शाहीन खान, प्रा. केतन शिर्तुरे, प्रा. मुदस्सिर गेनाई, प्रा. शबनम तसेच उपप्राचार्य डॉ. अंजली कुलकर्णी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमीन काजी यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ. तन्वीर खान यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Tags: जळगाव, स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट, एच. जे. थीम कॉलेज, इकरा एज्युकेशन सोसायटी, स्वातंत्र्य दिन सोहळा, विद्यार्थ्यांची देशभक्ती, देशभक्तीपर कार्यक्रम, अब्दुल माजिद जकेरिया, तारिक रऊफ शेख

