नांदुरा (प्रतिनिधी) : शहरातील गैबी नगर व शांती नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येबाबत समाजवादी पक्षाने नगर परिषद प्रशासनाला कडक अल्टीमेटम दिला आहे. युवा जिलाध्यक्ष आजाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गैबी नगर व शांती नगर परिसरात मागील सुमारे ४० वर्षांपासून नियमित व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने व निवेदने दिली असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या या परिसरातील नागरिकांना बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने टँकरद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा सुरू करण्याची तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून लवकरात लवकर पाइपलाइन टाकून जलपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने १० मे २०२६ पर्यंत पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न केल्यास किंवा लेखी उत्तर न दिल्यास, ११ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता नगर परिषद कार्यालयावर ‘आंघोळ मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचा इशाराही समाजवादी पक्षाने दिला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी होणार असून कायदा व सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी युवा उपजिलाध्यक्ष शेख नदीम, युवा नेते तोसीफ बिल्डर, अझर मिर्झा, इंतजार हुसैन, शेख इमरान, शेख अरबाज, सोहेल, हाफीज साहेब यांच्यासह समाजवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
