मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट व जोरदार पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदविण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच दूरध्वनीवरून आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने तात्काळ नोंदवावी. तसेच ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही त्यांनी तालुक्यातील विमा प्रतिनिधी किंवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिक विम्यात क्षेत्र कमी दाखविण्यात आले आहे किंवा ज्यांचा विमा अर्ज रद्द झाला आहे, अशा प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष पंचनामा करून वास्तविक क्षेत्र ग्राह्य धरण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व पीक विमा धारक शेतकऱ्यांनी याबाबत तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.