हयात दाखला ३० पर्यंत द्यावा, अन्यथा पेन्शन (वेतन) बंद…….. मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांची माहिती
मुक्ताईनगर प्रतिनिधी ….
मुक्ताईनगर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग निवृत्ती वेतन योजनांतील सर्व लाभार्थीनी ३० जून २०२६ पूर्वी डिजिटल हयात प्रमाणपत्र जमा करावे; अन्यथा पेन्शन (वेतन) बंद होईल, असे आवाहन तहसीलदार गिरीश वखारे यांनी केले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी लाभार्थीचे हयात व उत्पन्न प्रमाणपत्र अद्ययावत करणे आवश्यक असते. लाभार्थींनी सीएससी केंद्र किंवा ग्राम महसूल अधिकारी कार्यालयामार्फत ‘ऑनलाइन बेनिफिशियरी सत्यापन अॅप’वर डिजिटल हयात प्रमाणपत्र काढून ते तहसील कार्यालय, तलाठी किंवा कोतवाल यांच्याकडे जमा करावे. मुदतीत प्रमाणपत्र न दिल्यास ऑनलाइन प्रणालीद्वारे पेन्शन आपोआप बंद होऊ शकते. दरम्यान, दिव्यांग योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ऑनलाइन दिव्यांगत्व प्रमाणपत्र, आधार कार्ड व बँक पासबुक प्रत जमा केलेली नाही, त्यांनी ती तातडीने संजय गांधी शाखेत सादर करावी. प्रमाणपत्रावरील नाव किंवा जन्मतारखेत तफावत असल्यास पुराव्यांसह अडचर्णीसाठी तलाठी, कोतवाल किंवा तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार श्री. वखारे यांनी केले आहे.