मलकापूर : तालुक्यातील विवरा गावातील अपूर्ण नाला खोलीकरण व विवरा-रणगाव रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अन्यथा १६ मे २०२६ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उबाठा) व ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
विवरा गावातील नाला खोलीकरण व विवरा-रणगाव रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात २८ एप्रिल २०२६ रोजी तहसीलदार समाधान सोनवणे यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत आणि शहरप्रमुख हरिदास गणबास यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नाल्यातच आमरण उपोषण सुरू केले होते.
दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासकांनी पाच दिवसांच्या आत संबंधित कामे सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीनंतरही नाला खोलीकरण व रस्त्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संबंधित कामे पुढील पाच दिवसांत पूर्ण न झाल्यास १६ मे २०२६ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला
