भुसावल रेल्वे विभागातून पुणे व मुंबईसाठी थेट रेल्वे गाड्या सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. प्रशांत बोरकर यांच्या सातत्यपूर्ण मागणीस मोठे यश मिळाले आहे. या निर्णयामुळे खंडवा, बुरहानपूर, रावेर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भुसावल विभागातून पुणे-मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा खंडवा-बुरहानपूर-रावेर मार्गेच सुरू करण्यात यावी, अशी ठाम व आग्रहाची मागणी श्री. बोरकर यांनी सुरुवातीपासून लावून धरली होती. या मागणीसाठी त्यांनी रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वे युनियन व युवक संघटनांशीही त्यांनी समन्वय साधत विषय लावून धरला होता.
प्रशांत बोरकर यांच्या मागणीनुसार 2024 सालीच भुसावल रेल्वे विभाग व मध्य रेल्वे मुंबई यांनी संयुक्तरित्या रेल्वे बोर्डाकडे अधिकृत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला आता सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, लवकरच पुणे व मुंबईसाठी भुसावल विभागातून थेट रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निर्णयामुळे शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार असून, उत्तर महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागाचा विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. भुसावल विभागातील प्रवाशांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



