मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि भारतीय सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणाच्या उद्देशाने गायीस राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावे तसेच गोवंश संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, या सह प्रमुख 6 मागण्यांसाठी मुक्ताईनगर तालुका एकता संघटनेच्या वतीने भारताचे राष्ट्रपती यांना तहसीलदार, मुक्ताईनगर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, गाय ही भारतीय संस्कृती, कृषी व्यवस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग असून तिचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेती, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय खत निर्मिती तसेच पर्यावरण संवर्धनामध्ये गायीचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याने तिच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने विशेष राष्ट्रीय धोरण राबविण्याची गरज आहे.
यावेळी देशातील अवैध गोवंश वाहतूक, तस्करी आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, गोवंश संवर्धनासाठी प्रभावी कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, भटक्या व निराधार गोवंशासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच गोसंवर्धनासाठी स्वतंत्र राष्ट्रीय धोरण तयार करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदर मागण्या कोणत्याही समाजाविषयी द्वेषभावना निर्माण करण्यासाठी नसून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या सकारात्मक उद्देशाने करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन सादर करताना मुक्ताईनगर तालुका एकता संघटनेचे समन्वयक हकीम चौधरी, शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, सामाजिक कार्यकर्ते मुख्तार खान, आसिफ शेख, अब्दुल रफीक मजीद, खजिनदार अहमद ठेकेदार, मुतवल्ली कलीम मनियार, ऍडव्होकेट आसिफ आझाद,अल्ताफ आझाद, सामाजिक कार्यकर्ता अकिल शेख, पत्रकार रिजवान चौधरी आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी गायीस राष्ट्रीय पशू घोषित करा :…. मुक्ताईनगर तालुका एकता संघटना
-