मुक्ताईनगरच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; ३८५ कोटींचा भरघोस निधी मंजूर
…… चौथ्या टप्प्यातील ४१३ घरांचा प्रश्न सुटला; जलसंपदा व मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
मुक्ताईनगर प्रतिनिधी:-……..
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुक्ताईनगरमधील पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मुंबई येथे 7 एप्रिल रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण संयुक्त बैठकीत मुक्ताईनगर शहर आणि परिसरातील विविध गावांच्या पुनर्वसन कामांसाठी ३८५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून विकासाचा नवा मार्ग प्रशस्त झाला आहे. निधी अभावी काम रखडलेले होते परंतु आज झालेल्या बैठकीमध्ये 385 कोटीचा निधी मंजूर झालेला असून आता कामाला गती येईल तसेच मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक 12 व 13 ला लागून किंवा अन्य ठिकाणी चौथ्या टप्प्यातील पुनर्वसित जागा आरक्षित केली जाणार असल्याचे मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
संत मुक्ताई पुनर्वसन समिती चौथा टप्पा मुक्ताईनगर समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक गणेश टोंगे , पुनर्वसन समितीचे सचिव पत्रकार संदीप जोगी , उपाध्यक्ष आरिफ आझाद , समितीचे सर्व सदस्य , विद्यमान नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, आजी माजी नगरसेवक तसेच आमदार पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी वेळोवेळी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत ही संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन निधीची तरतूद करण्यात आली. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, माफदाचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ , भाजपा रावेर लोकसभा संपर्कप्रमुख नंदकिशोर महाजन, आणि विविध गावांतील ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते.
….. या निधीतून प्रामुख्याने खालील कामांना गती मिळणार आहे:
मुक्ताईनगर शहर: रखडलेल्या ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांचा पुनर्वसन प्रश्न कायमचा सुटणार आहे.
नागरी सुविधा: विविध गावांमधील प्रलंबित नागरी सुविधा आणि नवीन घरांच्या प्रस्तावांसाठी या निधीचा विनियोग केला जाईल.
लाभार्थी गावे:…..
भोकरी, पातोंडी, सुलवाडी, कोळोदा, अंतुर्ली, धामणदे, नरवेल, पिंप्री नांदू, बेलसवाडी, मुंडोळदे खडकाचे, मुंढोदे, उचंदा शेमळदे, मेळसांगवे, पंचाणे, खामखेडा, भामलवाडी, शिंगाडी, मांगलवाडी, कांडवेल, तांदलवाडी, पुरी गोलवाडे, घोडसगाव, चिचखेडा बुद्रुक आणि आंदलवाडी.
’दिलेला शब्द पाळला……
मुक्ताईनगर परिसरातील विस्थापितांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. वारंवार होणाऱ्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. “विकासाचा संकल्प आणि प्रगतीचा मार्ग” हे ब्रीद सार्थ ठरवत, सरकारने दिलेल्या शब्द पाळल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. ३८५ कोटींच्या या निधीमुळे गावांचा कायापालट होणार असून मूलभूत सुविधांचा प्रश्न निकाली निघणार आहे.



