मुक्ताईनगर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यंदा चांगलीच चुरस पाहायला मिळाली. प्रचाराच्या काळात आरोप–प्रत्यारोपांची जोरदार फेरी रंगली असून, या निवडणुकीत आजी व माजी लोकप्रतिनिधींसह सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याची चर्चा मतदारसंघात जोर धरू लागली आहे.
सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून, अनेक ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मतदारराजाने कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य दिले, याचा थेट परिणाम निकालावर होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
प्रत्येक पक्षाचे उमेदवार आपला विजय निश्चित असल्याचा दावा करत असले, तरी नेमकी कोणाची ‘लॉटरी’ लागणार आणि कोण गुलाल उधळणार की कोणाच्या वाट्याला अबीर पडणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीतून मतदारसंघावर नेमकी कोणत्या लोकप्रतिनिधीची पकड मजबूत आहे, हेही समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.
या निकालाचा परिणाम येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या महानगरपालिकेची आदर्श आचारसंहिता लागू असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या नजरा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालावर केंद्रित झाल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसारखीच परिस्थिती पुढील निवडणुकांतही निर्माण झाल्यास, सर्वच पक्ष मोठ्या संख्येने उमेदवार उभे करतील, असे संकेत मिळत आहेत. यंदाच्या निवडणुकीत ‘हिंदुत्व विरुद्ध विकास’ हा मुद्दा केंद्रस्थानी राहिला असला, तरी मतदारराजाच्या मनात नेमके काय आहे, हे निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.





