मुक्ताईनगर (अतिक खान)
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी गटारीतून काढलेला दुर्गंधीयुक्त कचरा अद्यापही वार्ड क्रमांक ११ मध्ये नागरिकांच्या घरासमोर तसाच पडून आहे.
या घाण कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, रोगराईचा धोका वाढला आहे. टायफॉईड, मलेरिया आणि इतर साथीचे आजार पसरण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
“कचरा साफ केल्यानंतर लगेच उचलणे गरजेचे असताना नगरपंचायतीकडून कोणतीही कारवाई झाली नाही,” असा आरोप स्थानिकांनी केला आहे. दोन दिवस उलटूनही नगरपंचायतीची गाडी कचरा उचलण्यासाठी न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक प्रशासनाने तातडीने या परिस्थितीकडे लक्ष देऊन कचरा उचलण्याची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.






