Advertisement
मलकापूर :पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालय परिसरात विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच देशभक्तीपर घोषणा देत या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करणारे भाषण आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषवाक्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सरदार पटेल यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, “देशातील विविध प्रांत, संस्कृती आणि समाजघटकांना एका धाग्यात ओवण्याचे कार्य सरदार पटेल यांनी केले. त्यांच्या नेतृत्वगुणांमधून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी.”
कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे व आय क्यू ए सी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी यांनी केले. या दोन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना आणि जबाबदारीची जाणीव रुजविण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मलकापूर शहरातील जनता कला वाणिज्य महाविद्यालयाच्या परिसरात एकतेची शपथ घेतली व युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्या माय भारत या अभियानांतर्गत मलकापूर येथे युनिटी मार्च रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यामध्येमाननीय केंद्रीय मंत्री रक्षा ताई खडसे, माननीय आमदार चैनसुख संचेती, माननीय प्रणित सांगवीकर जिल्हा युवा अधिकारी यांचा पण सहभाग होता.
कोलते महाविद्यालयातील कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापकवर्गातील प्रा. सदाशिव लवंगे, प्रा. मधुकर टेकाडे, प्रा. राजेश सरोदे, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. निलेश बुडूखले, प्रा. निलेश बुंधे, प्रा. अंकुश नारखेडे, प्रा. पांडुरंग चोपडे, प्रा. कैलास कोळी तसेच प्राध्यापिका संगीता खर्चे, तेजल खर्चे, भाग्यश्री नारखेडे, प्रा. ख्याती चौधरी, प्रा. चैताली नारखेडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशाच्या ऐक्य, अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणाची शपथ घेतली. महाविद्यालय परिसर देशभक्तीच्या जयघोषांनी दुमदुमला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर, घोषवाक्ये आणि देशभक्तीपर संदेशांनी वातावरण अधिक प्रेरणादायी बनले.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय गीताने समारोप झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, समाजबंध आणि लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी एन एस एस स्वयंसेवक, प्राध्यापकवर्ग आणि प्रशासनाचे सहकार्य लाभले.
Subscribe to Viral News Live







