
मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा शिवारात गट क्रमांक ६६ मधील शेतकरी अशोक धबाडे यांच्या मालकीच्या शेतात घुसून बिबट्याने बांधलेल्या वळूवर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली. यामुळे परिसरात शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. वन विभागाने घटनास्थळी मिळालेल्या प्राण्यांचे पगमार्ग ( पायांचे ठसे) घेतलेले असून त्या परिसरामध्ये तीन ट्रॅप कॅमेरे वेगवेगळ्या दिशेला लावण्यात आलेले असल्याचे वनपाल दीपश्री जाधव व वनरक्षक दिपाली बेलदार यांनी सांगितले.
नेमके मिळालेले पायांचे ठसे कोणत्या प्राण्याचे हे आताच सांगता येत नसून तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा शिवारात वळू बांधलेला असताना बिबट्याने अचानक झडप घातली. रात्रीच्या वेळी जनावरांच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून शेतकरी घटनास्थळी धावले; मात्र तोपर्यंत वळूचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. नागरिकांनी सतर्क राहावे, रात्री जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत व एकट्याने बाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
दरम्यान, गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांनी जिल्हा वनसंरक्षक राम धोत्रे यांच्याशी संपर्क साधून तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे हरताळा परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.





