मलकापूर (प्रतिनिधी): येथील लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ट्रेंड्स अँड रिसर्च इन इंजिनीअरिंग अँड सायन्स’ ‘आय.सी.आर.टी.आर.ई.एस. २के२६’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे ३० आणि ३१ जानेवारी रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आधुनिक प्रवाहांवर चर्चा करण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ ठरले आहे.या परिषदेचे मुख्य पाहुणे तसेच मुख्यवक्ते म्हणून सिंगापूर येथील आयईईई चॅप्टर अध्यक्ष तसेच नामवंत तज्ज्ञ डॉ. दीपक वाईकर उपस्थित होते. आपल्या ‘की-नोट’ भाषणात त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील जागतिक आव्हाने आणि संशोधनाच्या संधींवर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी आपल्या भाषणातून परिषदेची भूमिका मांडली. “संशोधन हे समाजाच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी असावे,” असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी आपल्या भाषणात ‘इमर्जिंग टेक्नॉलॉजी’ आणि इंजिनीअरिंगमधील नवीन बदलांवर भाष्य केले. तसेच ‘आय.क्यू.ए.सी.’ समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत अशा परिषदांचे असलेले महत्त्व विशद केले.या भव्य आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अरविंद कोलते आणि खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे संशोधक आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यवस्थापन समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही परिषद ‘हायब्रीड मोड’मध्ये म्हणजेच ‘ऑफलाईन’ आणि ‘ऑनलाईन’ अशा दोन्ही पद्धतीने पार पडली. यामुळे देश-विदेशातील अनेक संशोधकांना सहभागी होणे शक्य झाले. विशेष म्हणजे, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्थापत्य, संगणक, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध विभागांतील संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले.कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन फातेमा सरकार मॅडम यांनी केले. परिषदेचे कन्व्हेनर प्रा. वाय. बी. जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या परिषदेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे.






