पंपगृह तोडफोड व साहित्य स्थलांतर प्रकरणात प्रशासनाची दिरंगाई; आदेश असूनही एफआयआरला टाळाटाळ का
मुक्ताईनगर अतिक खान
मुक्ताईनगर शहरातील मुक्ताई सहकारी उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहाची तोडफोड व साहित्य गायब झाल्याचा गंभीर प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. सुरुवातीला चोरीचा संशय व्यक्त करण्यात आला होता; मात्र सखोल चौकशीनंतर चोरी नसून पंपगृहाची जाणीवपूर्वक तोडफोड करून साहित्य स्थलांतरित केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार सार्वजनिक मालमत्तेवर घाला घालणारा असतानाही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी तापी खोरे सर्वेक्षण विभाग, जळगाव येथील कार्यकारी अभियंत्यांनी उपविभागीय अभियंत्यांना मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. जलसंपदा विभागाला कोणतीही पूर्वसूचना न देता पंपगृहाची तोडफोड व साहित्य स्थलांतर करण्यात आल्याने विभागाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, दिनांक २० रोजी लेखी आदेश देण्यात येऊनही आजतागायत कोणतीही एफआयआर दाखल झालेली नाही. त्यामुळे “स्पष्ट आदेश असतानाही पोलीस प्रशासन कारवाईपासून का दूर आहे?” असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसारखा गंभीर गुन्हा घडूनही कारवाईला विलंब होत असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात कोणाला वाचवले जात आहे का? की दबावाखाली गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
आता या प्रकरणात नेमकी केव्हा एफआयआर दाखल होणार, दोषींवर कधी कारवाई होणार आणि प्रशासन ही दिरंगाई थांबवणार का, याकडे संपूर्ण मुक्ताईनगरचे लक्ष लागले आहे.






