बुलढाणा, प्रतिनिधी: शासनाच्या जाहिरात दरात तातडीने १५० टक्के वाढ करावी, तसेच प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, या प्रमुख मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या वतीने आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तासांचे धरणे आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.
गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या आणि पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. सन २०१९ पासून कागद, शाई, प्रिंटिंग साहित्य आणि वीज दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असताना शासनाचे जाहिरात दर मात्र मागील सात वर्षांपासून बदललेले नाहीत. त्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत सापडल्याचे आंदोलकांनी नमूद केले.
संघटनेच्या वतीने जाहिरात दरात १५० टक्के वाढ करणे, ई-टेंडर जाहिराती संक्षिप्त स्वरूपात न देता पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, जाहिरात देयके ३० दिवसांच्या आत व्याजासह अदा करणे, तसेच लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी देणे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. याशिवाय पत्रकारांवरील दडपशाही आणि राज्यातील टार्गेट पॉलिटिक्सचा निषेधही व्यक्त करण्यात आला.
यावेळी अकोला येथील पत्रकारांवरील कारवाई, नांदेड येथील महिला पत्रकार मुक्ता कदम यांच्यावर दाखल झालेले गुन्हे तसेच अर्धापूर येथील पत्रकार मनोज मन्नपूर्वे यांच्या अपहरणाच्या प्रयत्नाचा उल्लेख करत या घटना लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी प्रतिनिधी अरुण जैन, विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख, माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, कृष्णा सपकाळ, तालुका अध्यक्ष डॉ. विजय जट्टे, नितीन कानडजे, शौकत शहा, प्रवीण थोरात, हर्षनंदन वाघ, शेख नदीम, आत्माराम सोनूने, साबीर अली, सचिन लहाने, सोहम घाडगे, सुखनंदन इंगळे, अक्षय थीगळे, किरण नाईक, जाकीर शाह, शेख इद्रिस, दीपक मोरे, नीलेश राऊत, सुनील तिजारे, सोहील शाह, सुनील खंडारे, संदीप वानखेडे, पवन सोनारे, नीलेश जोशी, संजय जाधव, सागर जयस्वाल, राम चतुर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप वंत्रोले यांनी दिली.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने १५० टक्के दरवाढ जाहीर करावी, जाहिरात वाटपातील वशिलेबाजी थांबवून सर्व जाहिराती माहिती खात्यामार्फत देण्यात याव्यात आणि पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा देशभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अरुण जैन यांनी दिला.




