अरे बापरे, कामाचे अंदाजपत्रकाला मंजुरी नसताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर केले काम.
——- दोषीवर कारवाई होणार.. कार्यकारी अभियंता
मुक्ताईनगर (प्रतिनिधी):……….
महावितरणच्या कोथळी युनिट मधील हरताळे शिवारातील विद्युत वाहिनी शिफ्टिंग कामा च्या अंदाजपत्रकाला वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी मिळालेली नसताना काही अधिकारी व ठेकेदाराने संगणमताने सदरचे काम पूर्ण केलेले असून याची चौकशी करण्याचे आदेश महावितरणचे उपविभागीय अभियंता श्री शुक्ला यांना देण्यात आलेले असून याप्रकरणी सखोल चौकशी करून वरिष्ठांना दोषींवर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे मुक्ताईनगर येथील महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री चव्हाण यांनी सांगितले.
महावितरणच्या नियमावलीनुसार अशा कामांसाठी सविस्तर अंदाजपत्रक तयार करून ते उपविभागीय, विभागीय आणि मंडळ स्तरावर मंजुरीसाठी पाठवणे अनिवार्य असते. मात्र,नियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवत बेकायदेशीर पद्धतीने लाखो रुपयांचा व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून संपूर्ण प्रक्रिया डावलत काम आधीच पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून, त्यासाठी किती खर्च येतो हा आकड्याला अजून अंदाजपत्रकात मंजुरी मिळाली नसून यासाठी संबंधित कन्सुमर कडून खर्च घेतला जातो असेही कार्यकारी अभियंता श्री चव्हाण यांनी सांगितले.
संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही थेट कारवाई न करता त्यांना वाचवण्यासाठी “बॅकडेट प्लॅन” आखल्याची चर्चा विभागात रंगली आहे. 4 मार्चला पाठवलेले अंदाजपत्रक 24 मार्चपर्यंत कुठे होते, हा प्रश्न आता प्रामाणिक अधिकाऱ्यांनाही पडला आहे.
संबंधित प्रभारी कनिष्ठ अभियंता त्यांच्या कार्यकाळात उपविभागीय कार्यालयात पाठवण्यात आलेले हे अंदाजपत्रक तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे पाठवण्यात आलेले अंदाजपत्रक गृहीत धरता पूर्वसंमती न घेताच संबंधित ठेकेदार जेव्हा हे काम करत होता तेव्हा त्याला सदर शिफ्टिंग कामासाठी विद्युत प्रवाह बंद करण्यासाठी परमिट कोणी दिला, त्यावेळेस फील्ड वरील वायरमन, लाईनमन, बाह्य स्रोत कर्मचारी काय करत होते? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
या सर्व प्रकरणामुळे संतप्त नागरिकांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली असून, दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. आता अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता या प्रकरणात वस्तुनिष्ठ कारवाई करणार की फक्त कागदी घोडे नाचवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




